त्यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नांचा पिच्छा करून, समाजातल्या गोरगरीब घटकांपर्यंत जाऊन ; लोकशाहीच्या मूल्यांचे संवर्धन करायचे आहे. त्यासाठी, हा नश्वर देह उपेक्षित, वंचितांच्या कामी यावा, हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी वैखरीची वाट निवडली. त्या चालत्या झाल्या. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. दोन दशकापासून त्या लढा देताहेत. आधुनिक काळातली, ही सत्यभामा घर प्रपंच सांभाळून, सामाजिक चळवळीत शाश्वत काम करतेय. समाज त्यांना अप्रिशिएट करतोय. त्यांच्या चळवळीचे बिजे समाजाला उर्जा देत आलेत.
सत्यभामा भुजंग सौंदरमल , मु.पो. माजलगाव जि.बीड [ मराठवाडा ] त्यांची कर्मभूमी. माजलगाव तालुक्यातील सादोळा हे त्यांचे आजोळ आहे. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण माजलगाव आणि काबरा कालेजात त्यांनी एमएसडब्लू [ मास्टर ऑफ सोशल वर्कर ] विषयात उच्च शिक्षण घेतले आहे.
आजोळी घडलेल्या एका [ चोरीचा आळ -१९९९ ] प्रकारणा मुळे सौंदरमल कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, त्यांनी गावाला पाठ दाखवली. त्या कठीण प्रसंगात स्व. एकनाथ जिजा, दलित चळवळीतला आदर्श
ज्येष्ठ बाबुराव पोटभरे यांनी मदत केल्याचा उल्लेख करताच, त्यांना भरून आले.
मुळातच बंडखोर स्वभाव, त्यातच समाजकार्याशी संबंधित उच्च शिक्षणा मुळे त्या सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या. मानवी हक्क अभियानचे प्रमुख ॲड एकनाथराव आव्हाड [ जिजा ] यांच्या संपर्कात आल्या. सात -आठ वर्ष त्यांनी मानवी हक्काच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. समाजतल्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष दिले. महिलांचे नेमके प्रश्न काय आहेत. ते सोडवायचे तर, विधायक, कायदेशीर मार्गाने काय करता येईल. वेठबिगारी, अल्पवयीन मुलींच्या बाबतीतला लग्ना सारखा गंभीर विषय कसा हातळता येईल, या संदर्भात त्यांची मते खूप संवेदनशील आहेत. खर म्हणजे, जिथे कमी, तिथे आम्ही, या न्यायाने सत्यभामा सौंदरमल यांनी काम केलय. खर म्हणजे, शैक्षणिक अभ्यासक्रमात सर्वात महत्वाचा गाभा घटक म्हणजे, समाजातला सामाजिक अडसर ; याच मुद्याला टारगेट करून सत्यभामांनी, हे सगळे अडसर सरकार दरबारी आणून लक्ष वेधले आहे. सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांनी शंभरावर बाल विवाह रोखलेत. कोवळ्या वयातली लग्ने, समाजातली शोकांतिका आहे. याचे दुष्परिणाम आज नाहीतर उद्या जाणावताच, तेव्हा खूप उशिर झालेला असतो. त्यांचे, हे निरीक्षण काळाचा वेध घेणारे आहे. दोन दशकाहून अधिकच्या काळापासून, त्यांनी फिल्डवर जाऊन काम करताहेत. त्यांना, अन्याय सहन होत नाही. त्यांचा अंतरात्मा त्यांना जागे करत राहतो. भिती त्यांना मान्यच नाही. स्वतःपेक्षा गरजू, पीडित, वंचित, उपेक्षित समाजाचा आवाज होऊन, लढणारी ही सावित्रीची लेक, न्याय दिल्याशिवाय माघार घेत नाही. शेकडो प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. त्या प्रश्नांना ऐरणीवर आणले. मध्यप्रदेश राज्यातील जवळपास ३० – ३५ महिला – पुरूष कामगार, माजलगाव तालुक्यात शेती कामासाठी आणले होते. त्यांच्याकडून तीन महिने कष्टाची कामे करून घेतली. दिवसभर काम करून घ्यायचे. मात्र, त्यांना अर्धपोटी ठेवून, वेळ प्रसंगी मारहाण व्हायची. मराठी त्यांना येत नव्हते. नेमकी दाद मागायची कुठे ? असा प्रश्न उभा राहीला. अखेर, अत्याचाराचा कडेलोट झाल्यावर, ते सगळे मजूर पळून माजलगाव शहरात आले. पोलीसात गेले. तिथे गोंधळ सुरू झाला. सौ. सत्यभामा सौंदरमल यांनी त्या आवाजाच्या दिशेने सहज म्हणून चौकशी केली. प्रकरण गंभीर होते. त्यांनी , या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. प्रिंट – इलेक्ट्रॉनिक [ मुद्रित -दृकश्राव्य ] माध्यमांना माहिती दिली. स्वतःच्या ब्लॉगवर, फेसबुक वर, सदरील प्रकरणावर प्रकाश टाकला. शेवटी प्रशासनाला दखल घ्यावी लागली. त्या अन्यायग्रस्त कामगार मजुरांना
न्याय मिळाला. त्यांच्या घामाचा मोबदला वसूल करून, त्या कुटुंबाला सुखरूप पाठवण्याची जबाबदारी पार पाडली. एवढेच नाही,
अनेक कुटुंबांना वेठबिगाराच्या साखळदंडातून मुक्त केलय. माजलगाव [ जि.बीड ]शहरात एका वयोवृद्ध आजोबा सोबत भिक मागत फिरायचे. त्यांच्या सोबत दोन मुली ही फिरायच्या. त्या दोन्ही मुलींना जवळ घेतले, मायेने कुरवाळले. त्यांची वेणी-फणी घातली. दोन तीन दिवस सांभाळून, बालग्राम चे संस्थापक संचालक संतोष [ दादा ] गर्जे यांना संपर्क केला. सगळी माहिती सांगितली. बालग्राम [ अनाथालय ] मध्ये , त्या मुली उपवर झाल्यात. चांगले शिक्षण पूर्ण करताहेत. याचे सगळे श्रेय सत्यभामांना जाते.
लोकांना, लोकशाहीत आपले अधिकार, कर्तव्य माहित असले पाहिजेत. तरच, वंचित, उपेक्षितांना न्याय मिळेल. नसता, लोकशाहीच्या नावाखाली धनधांडगे अन्याय अत्याचार करत राहतात. संविधान, उपेक्षितांचा आत्मा आहे. तो वाचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे वाचल्याने मस्तक सुधारते. या अर्थाने, ती जबाबदारी, आपली आहे. असे निरिक्षण नोंदवणाऱ्या सत्यभामा संविधानाचा जागर करताहेत. महामानवांनी जोडीदार जपले. अगदी, प्राणपणाने एकमेकांना समजून घेतले. अताच्या काळात नेमकी अडचण लक्षात येत नाही. एवढा ताणतणाव वाढतो आहे. ही चिंताजनक बाब आहे. म्हणून, नातं प्रगल्भ, वैचारिक पातळीवर सुदृढ असायलाच हवे. एकमेकांना समजून उमजून घेणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. त्यांचे मिस्टर नारायणराव डावरे हे नेहमीच पत्नीच्या पाठिशी खंबीर पणे राहीलेत. आचार विचार जुळवून घेतले. उत्तम समन्वयक ठेवला आहे. त्यांच्या संसाराची वेल मांडवावर गेलीय. दोन मुली [ सांची,मैत्रेयी ] आहेत. एक विज्ञान शाखेत शिक्षण घेतेय, तर दुसरीला जिल्हाधिकारी व्हायचय.
सत्यभामा, सोशल नेटवर्किंग साईटवर मोकळेपणाने व्यक्त होत राहतात. महिलांचे अनेक विषय त्या बेधडक पणे मांडतात. काहींना वाटत, त्या खूपच भडक लिहतात, बोलतात. वास्तविक पाहता, बोलणे, लिहणे भडक नसते. रंग [ कलर्स ] भडक असतो. फार तर, त्या आक्रमक पणे मुद्दे मांडतात. थोड, डाव-उजव सोडून द्या, त्यांच्या बोलण्यामागची तळमळ, त्यातला नेमकेपणा किती वास्तवदर्शी आहे. याकडे तारतम्य ठेवून, डोळसपणाने पहायला काय हरकत आहे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, बाई, कुणाची तरी ताई,माई,आई असते. या अर्थाने, सत्यभाना नारायण सौंदरमल- डावरे दोन दशकापासून समाजाला सामाजिक जीवनसत्व देण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याची महाराष्ट्राने दखल घेतली. अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झालाय. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणालेत, दुरितांचे तिमीर जावो. सत्यभामा एक पणती होऊन चांगले काम करताहेत. सत्यभामा म्हणजे सत्याचा प्रकाश..!
[ आदिशक्तीचा जागर – माळ दुसरी ]
सुभाष सुतार , पत्रकार [ बीड ]
[ लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी आहेत