मुंबई – मस्साजोग [ बीड ] येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असून, खंडणी वसुली प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, ना. मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. स्वकीय आणि विरोधक, अशा दोन्ही बाजुनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग दिसून आल्यास, विरोधक आणखी आक्रमक होतील, अशी माहिती समोर येत असून
मुंडेंच्या राजीनामा कळीचा मुद्दा झाला आहे. ना. मुंडेची विकेट जाणार की स्वतःहून ते मंत्री पदाचा राजीनामा देणार ? याकडे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून, निर्दयी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, या प्रश्नावर महाराष्ट्रातून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी देशमुख यांची टाॅर्चर करून हत्या केली होती. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर, या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. खंडणी वसूली प्रकरणात वाल्मिक कराड शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, आरोपींना सोडणार नाही. कोणी कितीही जहागिरदार असला आणि कोणा ही नेत्याच्या जवळचा असला तरी, त्याला फासावर लटकवू , गुन्हेगारांना माफी नाही म्हणजे नाही. असा पावित्रा खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याने, देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, सीबीआय, बीड पोलीस ॲक्शन मोडवर आलेली आहे. आरोपींची बॅन्क खाती फ्रिज करण्यात आलीत. बीड मध्ये महामोर्चा काढून, देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात येऊन, आरोपीला फासावर लटकवा, अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली आहे.बीड जिल्ह्य़ातील आमदार ज्येष्ठ नेते प्रकाश दादा सोळंके [ अजितदादा गट ] , माजी मंत्री आ. सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होऊन धनंजय मुंडेंना घेरले आहे. वाल्मिक कराडचा दहशतवाद म्हणजे ना. धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद, असा थेट आरोप तिघांनी ही केला आहे. स्वपक्षातील आमदार, नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, खा. बजरंग सोनवणे, खा. सुप्रियाताई सुळे यांनी ही देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हेच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करून, आक्रमक पणे धनंजय मुंडे यांना टारगेट केले आहे. अद्याप, उपमुख्यमंत्री अजित दादांनी भूमिका जाहीर केलेली नाही. चौकशी अंती सत्य बाहेर येऊ द्या, मग निर्णय घेता येईल, अशी भूमिका ज्येठ मंत्री विखे पाटील यांनी मांडली आहे. भाजपा मध्ये दोन मतप्रवाह आहेत. ना. पंकजा मुंडे सायलेंट मोडवर आहेत. मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. ना. धनंजय मुंडे यांनी ही, आरोपींना फासावर लटकवा अशी मागणी केली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, त्यांनी राजीनामा द्यावा, काही काळ अलिप्त राहून देशमुख हत्या प्रकरणाचे सत्य बाहेर येऊ द्यावे, अशी मागणी करून, थेट हल्ला केला आहे. त्यामुळे, ना. धनंजय मुंडे कमालीचे अडचणीत आल्याची चर्चा असून, ते राजीनामा देतात की, अजित दादांचा आदेश आल्यावर पायउतार होतात, या कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.