मालवण (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम सुसाट आहे. यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. जिल्ह्यातील शिरोडा, वेंगुर्ले, देवगड, मालवण या महत्त्वाच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे शिरोडा, तारकर्ली, देवबागकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी आहे. गुगल मॅपवरील चुकीच्या मार्गाचा त्रास पर्यटकांना बसल्याचे दिसून आले.
पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागास असल्याने किनारपट्टी भागातील रिसॉर्ट, अन्य निवास व्यवस्था फुल्ल झाली आहेत. परिणामी पर्यटकांना लगतच्या गावांमधील निवास व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत होता. आता मात्र शहरातील निवास व्यवस्थाही फुल्ल झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळाले असून, लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.
सरत्या वर्षातील पर्यटन हंगामात येथे आलेल्या पर्यटकांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत होते.
सुरमई, पापलेट, बांगडा, सरंगा, कोळंबी यांसारख्या किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी पर्यटकांकडून मोठी मागणी आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी देश, विदेशातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात येथे शैक्षणिक सहलींबरोबरच पर्यटक दाखल झाले. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. मालवणी खाजे, अन्य खाद्यपदार्थांसह काजू, कोकम अन्य कोकणी मेव्यांची पर्यटकांकडून मोठी खरेदी झाल्याचेही या निमित्ताने दिसून आले.
गोव्याबाबत पर्यटकांचा निरुत्साह
भारतात डिसेंबर अखेरीस आणि सणांच्या हंगामात पर्यटक सर्वाधिक गोव्याला पसंती देतात. देश-विदेशातील पर्यटक ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात येतात. गोव्यातील समुद्र किनारे, बाजारपेठ, नाइट क्लबमध्ये नव वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक खास भेट देतात. पण सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात गोव्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे म्हटले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्यात पर्यटक आले नसल्याच्या दाव्यांवर आणि सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेवर पर्यटन मंत्र्यांनी म्हटले की, किनारपट्टीवर असलेल्या गोव्याचा पर्यटनाचा हंगाम जबरदस्त असा राहिलाय. फोर स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये खूप गर्दी आहे. त्यामुळे गोव्यातील बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे. गोव्याच्या पर्यटनामुळे उद्योगविश्वातही वाढ झाली. पर्यटन गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. यावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह होतो आणि हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.